आजचे युग हे सोशल मीडियाचे युग आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप, यूट्यूब, एक्स (ट्विटर) यांसारख्या डिजिटल माध्यमांनी संवादाची दिशा आणि गती पूर्णपणे बदलून टाकली आहे. विशेषतः आजची तरुण पिढी सोशल मीडियाशी घट्ट जोडलेली असून त्याचा त्यांच्या विचारसरणीवर, वर्तनावर आणि भविष्यातील वाटचालीवर खोलवर परिणाम होत आहे.
सोशल मीडियामुळे माहिती क्षणार्धात उपलब्ध होते. शिक्षण, रोजगार, व्यवसाय, सामाजिक प्रश्न, जनजागृती यासाठी हे एक प्रभावी साधन ठरत आहे. ग्रामीण भागातील युवकांनाही आपली मते मांडण्याची, आपली ओळख निर्माण करण्याची संधी सोशल मीडियाने दिली आहे. ही बाब निश्चितच समाजासाठी सकारात्मक आहे.
मात्र या सकारात्मकतेसोबतच नकारात्मक बाजूही दुर्लक्षित करता येणार नाही. अप्रामाणिक माहिती, अफवा, द्वेषपूर्ण पोस्ट, आभासी लोकप्रियतेची हाव यामुळे अनेक तरुण चुकीच्या दिशेने जात आहेत. ‘लाईक्स’ आणि ‘फॉलोअर्स’ यांच्याच भोवती जीवन केंद्रित होत चालल्याने अभ्यास, आरोग्य आणि कौटुंबिक नातेसंबंधांवर परिणाम होत असल्याचे दिसून येते.
आजची पिढी बुद्धिमान, ऊर्जावान आणि सर्जनशील आहे. गरज आहे ती या शक्तीला योग्य दिशा देण्याची. सोशल मीडियाचा वापर मनोरंजनापुरता न ठेवता ज्ञान, आत्मविकास आणि समाजहितासाठी केला गेला पाहिजे. यामध्ये पालक, शिक्षक आणि माध्यमांची भूमिका देखील महत्त्वाची आहे.
सोशल मीडिया वाईट नाही, पण त्याचा अतिरेक निश्चितच घातक ठरू शकतो. म्हणूनच आजच्या पिढीने विवेक, संयम आणि जबाबदारीने सोशल मीडियाचा वापर करणे ही काळाची गरज आहे. योग्य वापर केल्यास सोशल मीडिया प्रगतीचा मार्ग ठरू शकतो, अन्यथा तो दिशाभूल करणारा ठरू शकतो.
— संपादक
प्रा.महादेव आवारे
आवाज महाराष्ट्राचा

Facebook
0 Comments