महादेव आवारे | प्रतिनिधी,
राज्याचे उपमुख्यमंत्री, कडक शिस्तीचे आणि धडाडीचे नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे आज (28 जानेवारी) बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे.
आज सकाळी बारामती दौऱ्यासाठी मुंबईहून रवाना होत असताना अजित पवार यांच्या खासगी विमानाला बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान भीषण अपघात झाला. लँडिंग करत असतानाच विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने विमान थेट जमिनीवर आदळले. अपघात इतका भीषण होता की विमानाचे अक्षरशः तुकडे झाले होते.
अपघातात सहा जणांचा मृत्यू
या विमानामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह एकूण सहा जण प्रवास करत होते. अपघातानंतर सर्व जखमींना तातडीने बारामती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच अजित पवार यांच्यासह सर्व सहा जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत पुष्टी करण्यात आली.
राजकीय दौऱ्यावर असताना काळाने घातला घाला
राज्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना आज अजित पवार यांचा बारामती दौरा नियोजित होता. या दौऱ्यासाठीच ते आज सकाळी प्रवास करत होते. मात्र, नियतीने त्यांच्या जीवनप्रवासावर अचानक पडदा टाकला.
दादा पर्वाचा अकाली अंत
गेल्या साडेचार दशकांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात आपली वेगळी छाप उमटवणारे अजित पवार हे शरद पवार यांचे राजकीय वारसदार म्हणून पाहिले जात होते. त्यांची प्रशासकीय पकड, थेट निर्णयशैली आणि आक्रमक राजकारण यामुळे ते कायम चर्चेत राहिले. त्यांच्या अकाली जाण्याने पवार कुटुंबीयांसह राज्याच्या राजकारणाला मोठा धक्का बसला आहे.
अपघातग्रस्त विमानाचे दृश्य पाहून अनेकांचे अश्रू अनावर झाले. महाराष्ट्राने आज एक धडाडीचे, अनुभवी नेतृत्व गमावले आहे.

Facebook
0 Comments