जालना-प्रतिनिधी.- देवेंद्र गवई-
धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (एस.टी.) आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी पुकारलेल्या 'चलो मुंबई' आंदोलनापूर्वीच जालना जिल्हा प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. आंदोलनाचे नेतृत्व करणारे दीपक बोऱ्हाडे यांना पोलिसांनी आज पहाटे प्रथम नजरकैदेत ठेवण्यात आले होते. त्यानंतर अटक केली असून, संभाव्य उद्रेक टाळण्यासाठी जालना आणि अंबड तालुक्यात कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे.प्रशासनाकडून संचारबंदी २१ जानेवारी रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या भव्य आंदोलनासाठी आज, १७ जानेवारी रोजी जालना-अंबड येथून कूच करण्याचे नियोजन होते. मात्र, कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत प्रशासनाने पहाटे ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. केवळ बोऱ्हाडे यांची अटकच नाही, तर समाजातील अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. जिल्ह्याच्या सीमांवर आणि महत्त्वाच्या नाक्यांवर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
जामखेडमध्ये संतापाचा उद्रेक दीपक बोऱ्हाडे यांच्या अटकेचे पडसाद अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडमध्ये उमटले आहेत. जामखेड बसस्थानक परिसरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकासमोर कार्यकर्त्यांनी एकत्र येत टायर जाळून शासनाचा निषेध केला. "येळकोट येळकोट जय मल्हार" आणि "सरकार हमसे डरती है, पोलीस को आगे करती है" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
जालन्याकडे कूच करण्याचा प्रयत्नजामखेड येथील संतप्त कार्यकर्त्यांनी दीपक बोऱ्हाडे यांच्या समर्थनार्थ जालन्याकडे कूच करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करून त्यांना रोखले. "सरकारने दडपशाहीचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करू नये, आरक्षणाची अंमलबजावणी हीच आमची मागणी आहे," अशी ठाम भूमिका आंदोलकांनी मांडली आहे. सध्या जालना आणि आसपासच्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून, प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. नागरिकांना शांतता राखण्याचे आणि कायद्याचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
जालन्यात धनगर आंदोलनाचे नेते दीपक बोऱ्हाडे अटकेत; संचारबंदी लागू, आंदोलक संतप्त

Facebook
0 Comments