Ad Code

कासोदा येथिल आश्रम शाळेत गरीब विध्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य वाटप.

 

*"शिक्षण" हे वाघिणीचे दूध आहे जो हे पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, तर शिक्षणातूनच उज्ज्वल भविष्य घडते – प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड..!* 

एरंडोल प्रतिनिधी :- वि. रा. महाले

17/01/2026


कासोदा येथील समाज प्रबोधन व सेवाभावी समितीच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत एक अत्यंत स्तुत्य व अनुकरणीय उपक्रम राबविण्यात आला. येथील प्राथमिक आश्रम शाळेतील १२० ते १२५ निवासी विद्यार्थी तसेच गावातील विविध शाळांमधील प्रत्येकी १५ गरीब-गरजू विद्यार्थी, असे एकूण सुमारे २०० ते २२० विद्यार्थ्यांना मोफत बूट, चप्पल व कपड्यांचे वाटप करण्यात आले.

दि. १७ (शनिवार) रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. शिक्षणासोबतच सामाजिक संवेदनशीलतेची जाण देणारा हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण महर्षी पांडुरंगअण्णा पाटील गुरुजी हे होते. प्रमुख उपस्थितीत एरंडोल तालुक्याचे प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड, तहसीलदार गोपाल पाटील, गट शिक्षणाधिकारी आर.डी. महाजन, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील, समितीचे सदस्य तथा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष पत्रकार प्रमोदअण्णा पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून शैक्षणिक बाबतीत अत्यंत महत्त्वपूर्ण व प्रेरणादायी भाष्य केले. “परिस्थिती कितीही कठीण असली तरी शिक्षण हीच खरी ताकद आहे. परिश्रम, चिकाटी व सकारात्मक दृष्टिकोन ठेवून शिकल्यास प्रत्येक विद्यार्थी उज्ज्वल भविष्य घडवू शकतो,” असे प्रतिपादन त्यांनी केले.

तहसीलदार गोपाल पाटील, गट शिक्षणाधिकारी आर.डी. महाजन, सपोनी श्रीकांत पाटील, खडके माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र पाटील, पत्रकार प्रमोदअण्णा पाटील तसेच ज्येष्ठ समाजसेवक भास्कर चौधरी यांनीही मनोगतातून समाज प्रबोधन समितीच्या या उपक्रमाचे कौतुक करत, समाजाने अशा उपक्रमांत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका वैशाली सोनवणे यांनी केले, तर प्रास्ताविक मुख्याध्यापिका सुरेखा पाटील यांनी केले. शेवटी विद्यार्थ्यांना कपडे, सॉक्स, बूट व बिस्कीट वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

या प्रसंगी गावातील सर्वपक्षीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, पालक, शाळांचे मुख्याध्यापक व समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजातील गरजू घटकांसाठी हातभार लावणारा हा उपक्रम खऱ्या अर्थाने मानवतेचा संदेश देणारा ठरला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या