तालुका प्रतिनिधी | मौजे भामटवाडी, ता. मालेगाव, जिल्हा (वाशिम)
जंगलातील जमीन अनेक वर्षांपासून कसत उदरनिर्वाह करणाऱ्या संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या नावावर सातबारा उताऱ्यावर नोंद नसल्याच्या प्रश्नावरून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. १२ फेब्रुवारीपासून जंगलातच आंदोलनाला सुरुवात करण्यात आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचा आरोप आहे की, ते दीर्घकाळापासून जमीन कसत असतानाही महसूल नोंदींमध्ये त्यांच्या नावाची नोंद करण्यात आलेली नाही. परिणामी, शासकीय योजना, पीक कर्ज, अनुदान तसेच इतर लाभांपासून ते वंचित राहत असल्याची तक्रार करण्यात येत आहे.
उपोषणादरम्यान काही शेतकऱ्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
आंदोलनकर्त्यांनी प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
“जीव गेल्यावरच पंचनामा करणार का?” असा सवाल आंदोलनस्थळी उपस्थित करण्यात आला.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ व संबंधित महसूल नियमांनुसार प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करणे बंधनकारक आहे. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
हा प्रश्न आदिवासी जमीन हक्काशी निगडित असल्याने परिस्थिती अधिक संवेदनशील बनली आहे. उपोषणामुळे आंदोलनकर्त्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून, प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, तहसील प्रशासनाकडून याबाबत अधिकृत प्रतिक्रिया अद्याप प्राप्त झालेली नाही. परिस्थितीवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
📥 अधिकृत PDF आवृत्ती डाउनलोड करा

Facebook
0 Comments